गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : आखाती देशातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर बसला आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, सरकी आणि पाम तेलाच्या आयातीत अडथळे निर्माण झाले असून, मार्चमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील महिन्यात १५० रुपयांच्या आसपास असलेले सोयाबीन तेल आता १६५ ते १७० रुपयांवर पोहोचले आहे, तर शेंगदाणा, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. दर आठवड्याला बदलणाऱ्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून, हॉटेल व किराणा व्यवसायांनाही पुरवठा ठेवणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. परिस्थिती स्थिर होईपर्यंत महागाईचा सामना करावा लागणार आहे.
परिस्थिती कधी निवळणार?
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत महागाईची झळ कायम राहील. एकंदर परिस्थिती पाहता दैनंदिन वस्तूंच्या दरात आणखी किती वाढ होईल, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.
खाद्यतेलाचे दर कसे वाढले
तेल. 1 मार्च सध्याचा दर रू
सोयाबीन 150. 170
शेंगदाणा 160. 190
सूर्यफूल. 155. 175
सरकी. 145. 165
वरील दर प्रति किलो आहेत
आधीच गॅस मिळेना, पेट्रोलची धाकधूक !
जिल्ह्यासह तालुक्यात हॉटेल चालकांना गॅस मिळत नसल्याने व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. घरगुती गॅस सिलिंडरसाठीही तीन ते चार दिवसांची प्रतीक्षा आहे. वेळेत गॅस मिळत नसताना आता पेट्रोलचीही धाकधूक वाढली आहे.
मार्चमध्ये खाद्यतेल किती महागले ?
घाऊक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते २२ मार्च दरम्यान खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल आणि पाम तेलासह सर्वच तेलांच्या किमती वाढल्या आहेत.
वाहतूक विस्कळीत झाल्याने पुरवठ्यावर परिणाम
आखाती देशांतील युद्धामुळे जलवाहतूक तसेच हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम तेलाच्या आयातीवर होत आहे. परिणामी दरवाढीचा भडका उडाला आहे.
आखातातील युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत!
संजीवनी पखाले गृहिणी बीड
आखाती देशांतील युद्धाची झळ भारतीयांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. दैनंदिन खाद्यपदार्थाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून, प्रामुख्याने तेलाच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
स्वयंपाकघरातील खाद्यतेलासह इतर किराणामालाच्या किमतीदेखील वाढल्या असून, महिन्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.






















