शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्बळ्या गावात रेशन दुकान क्रमांक ११३ मध्ये धान्य वाटपात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार रेशन न मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित दुकानदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ महिन्याचे रेशन २९ मार्च रोजी वाटप करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार पळासनेर येथील दुकानदाराकडून धान्य वितरण करण्यात आले. मात्र, एकूण २७२ रेशनकार्डधारकांपैकी केवळ १८७ जणांनाच धान्य देण्यात आले, तर उर्वरित ८५ लाभार्थींना “धान्य संपले” असे सांगून परत पाठविण्यात आले.
या प्रकारामुळे वंचित लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन वर्षांपासून कमी धान्य मिळत असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित प्रकरणात रेशन दुकानदारासह तालुका धान्य पुरवठा अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रारी नोंदविल्या असूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील ३ ते ४ दिवसांत संबंधित कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास न्यायालयातही दाद मागण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
तक्रारदार:
अॅड. दारासिंग पावरा, अॅड. जयसिंग पावरा, भावसिंग पावरा, विनोद पावरा, पुनमचंद पावरा, दिवानसिंग पावरा, प्रवीण पावरा, संतीराम पावरा.






















