गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुशी (तांडा) येथे चाळीस वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार, दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत युवकाचे नाव गोरख शांतीलाल राठोड (वय ४० वर्षे) असे असून ते ऊसतोडणी तसेच शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, आई-वडील व भाऊ असा मोठा परिवार आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राठोड हे गेल्या काही वर्षांपासून कर्जबाजारी होते. दरम्यान, त्यांच्या मुलीचा विवाह नुकताच ठरला होता. आधीच कर्जाचा डोंगर असताना मुलीच्या लग्नासाठी आर्थिक व्यवस्था कशी करावी, या चिंतेतून ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून समोर येत आहे.
घटनेनंतर त्यांना तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.






















