देवा आत्राम मारेगाव प्रतिनिधी : यवतमाळ–पांढरकवडा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी लोकप्रिय आमदार मा. श्री. राजूभाऊ तोडसाम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी मा. अमित रंजन तसेच तहसीलदार मा. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, नूतनीकरण तसेच नवीन रस्ते कामांना मंजुरी देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी शेतकऱ्यांना शेतीपर्यंत सहज पोहोचता यावे, वाहतूक सुरळीत व्हावी आणि पावसाळ्यातही रस्त्यांची अवस्था चांगली राहावी, यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
योजनांची अंमलबजावणी करताना कोणतीही दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत त्यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या. जनतेच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळणार असून शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जनतेच्या समस्या जाणून घेऊन विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले नेतृत्व म्हणून आमदार राजूभाऊ तोडसाम यांची भूमिका यावेळी अधोरेखित झाली.






















