Times of Maharashtra Desk: निवडणुकीची तारीख जवळ येत असताना बांगलादेशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचं चित्र आहे. ढाकासह अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमध्येही वाढ झाल्याचे वृत्त आहे. अशाच एका घटनेत मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका उपजिल्हा परिसरात एका हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली.या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, काही काळासाठी ढाका–मैमनसिंग महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.
इस्लामचा अपमान केल्याचा आरोप
मृत तरुणाचे नाव दीपू चंद्र दास (वय ३०) असे असून, तो एका खासगी कारखान्यात काम करत होता. तो मैमनसिंगच्या तारकांडा उपजिल्ह्याचा रहिवासी होता. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, एका कार्यक्रमादरम्यान दीपूवर इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने त्याच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी रात्री (१८ डिसेंबर २०२५) स्क्वेअर मास्टरबारी भागातील पायोनियर निट कंपोझिट फॅक्टरी परिसरात घडली.
घटनेनंतर तणाव, पोलिसांचा बंदोबस्त
हत्या झाल्यानंतर परिसरात तणाव वाढला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला. काही वेळासाठी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
प्रशासनाची प्रतिक्रिया
भालुका उपजिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी मोहम्मद फिरोज हुसेन यांनी सांगितले की, पैगंबरांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.दरम्यान, बांगलादेशचे माजी मंत्री आणि अवामी लीगचे नेते मोहम्मद अली अराफत यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली देशात अतिरेकी प्रवृत्ती वाढत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
देशभरात चिंतेचे वातावरण
या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेला हिंसाचार देशाच्या स्थैर्यासाठी धोकादायक असल्याचं मत राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.






















