Times of Maharashtra Desk: बारामती नगरपरिषद निवडणुकीत एक ऐतिहासिक आणि लक्षवेधी निकाल समोर आला आहे. बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार संघमित्रा काळुराम चौधरी वय 21 यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून नगरसेविका पदावर विजय मिळवत बारामतीच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. हा विजय केवळ राजकीय नसून त्यांच्या वडिलांच्या दीर्घकालीन संघर्षाचे प्रतीक ठरला आहे.
बहुजन समाज पक्षाचे राज्य महासचिव काळुराम चौधरी हे पवार कुटुंबीयांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत नगरपरिषद, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांत सातत्याने प्रयत्न केले; मात्र यश त्यांना मिळाले नव्हते. यावेळी स्वतः काळुराम चौधरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.मात्र, राजकीय समीकरणे बदलत, पवार कुटुंबाच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्या चौधरी कुटुंबाचे स्वप्न त्यांच्या कन्या संघमित्रा चौधरी यांनी पूर्ण केले. अत्यंत कमी वयात नगरसेविका झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विजयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी बारामतीत पदयात्रा, सभा आणि व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून संघमित्रा चौधरी यांचा प्रचार प्रभावीपणे केला. नियोजनबद्ध प्रचार, लोकाभिमुख जाहीरनामा आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे मतदारांचा विश्वास संघमित्रा यांच्याकडे वळला.विजयानंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी या निकालाला “समाजाचा विजय” असे संबोधले. ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्यांक समाजाच्या एकजुटीमुळे हा बदल शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारादरम्यान त्यांनी बारामतीतील सत्ताधाऱ्यांवर आणि अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली होती.
संघमित्रा चौधरी यांचा विजय हा केवळ एक राजकीय यश नसून सामाजिक परिवर्तनाचे संकेत देणारा ठरतो. बहुजन आणि ओबीसी समाजाने दाखवलेला विश्वास बारामतीतील सामाजिक-राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण करत आहे.नव्या नगरसेविका म्हणून संघमित्रा चौधरी यांच्यासमोर नगरविकास, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि प्रशासनाशी समन्वय अशी अनेक आव्हाने असणार आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीकडे आणि निर्णयक्षमतेकडे आता संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे.






















