Times of Maharashtra Desk : राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असूनया निवडणुकांमध्ये महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली आहे. विशेषतः कोकणातील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मालवण नगरपरिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार कामगिरी करत 10 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले.
सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाने 11 जागा जिंकत आघाडी घेतली असून, शिंदे गटाच्या शिवसेनेला 7, काँग्रेसला 1 आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. कणकवली नगरपरिषदेत भाजपाला 9 तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. मात्र, भाजपाचे अधिक उमेदवार विजयी होऊनही नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे 145 मतांनी विजयी झाले. त्यामुळे कणकवलीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार व मंत्री तसेच भाजपाचे नेते नितेश राणे यांना राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टने राजकीय वातावरण तापले आहे.
“गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी… पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात… आता ती वेळ आली आहे,”
असे ट्वीट त्यांनी केले आहे. या ट्वीटमुळे मालवण आणि सावंतवाडीतील निकालांशी संबंधित अंतर्गत राजकीय घडामोडींबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकूण राज्याचा विचार करता, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाचाच वरचष्मा दिसून आला आहे. 288 पैकी 117 ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले असून, 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगराध्यक्षपद पटकावले आहे. केवळ नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यांत भाजपाला यश मिळाले नाही.
भाजपानंतर शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या 53 नगराध्यक्षांची निवड झाली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. याउलट, महाविकास आघाडीला या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला असून काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांना मिळून केवळ 44 नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. त्यामध्ये काँग्रेसला 28, ठाकरे गटाला 9 आणि राष्ट्रवादीला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात महायुतीची ताकद अधिकच ठळक झाली असून, कोकणातील अंतर्गत राजकीय संघर्ष आणि नेत्यांमधील मतभेद पुढील काळात अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.























