धीरज महांगरे ( पुणे प्रतिनिधी ) : हडपसर गाव ते गाडीतळ यांना जोडणाऱ्या भोसले गार्डन येथील उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या ठिकाणी अपुरा प्रकाश आणि योग्य इशारा व्यवस्था नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. उड्डाणपूल नेमका कुठून सुरू होतो हे वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे पुलाच्या कठड्याला धडक बसून अनेक अपघात घडत आहेत.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’चे पुणे शहर प्रतिनिधी धीरज महांगरे यांनी यापूर्वीही पुणे महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर महानगरपालिकेने त्या ठिकाणी काही रिफ्लेक्टर स्टिक बसविल्या होत्या. त्यामुळे काही काळ अपघातांचे प्रमाण कमी झाले होते.
मात्र कालांतराने धूळ साचल्यामुळे आणि अनेक रिफ्लेक्टर स्टिक खराब झाल्यामुळे त्या प्रभावीपणे दिसेनाशा झाल्या आहेत. परिणामी पुन्हा अपघात घडू लागले आहेत. आज पहाटे सुमारे पाचच्या सुमारासही उड्डाणपूल जिथून सुरू होतो त्या ठिकाणच्या कठड्याचा अंदाज न आल्यामुळे एका ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली.
पुणे शहरातील अनेक वाहनचालकांनाही या ठिकाणी पुलाची सुरुवात नेमकी कुठून होते हे लगेच लक्षात येत नाही. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनचालकांना तर याचा अजिबात अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. वारंवार ही बाब महापालिकेच्या निदर्शनास येऊनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसणाऱ्या यलो ब्लिंकिंग लाईट (सावधगिरीचे सिग्नल लाईट) बसविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. अशा प्रकारची ब्लिंकिंग लाईट बसविल्यास वाहनचालकांना दूरवरूनच उड्डाणपुलाची सुरुवात लक्षात येईल आणि अपघात टाळण्यास मदत होईल.
त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या ठिकाणी तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि यलो ब्लिंकिंग लाईट बसवाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धीरज महांगरे आणि नागरिकांकडून होत आहे






















