Times of Maharashtra Desk, Pune: ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी चक्क एमआयएमशी हातमिळवणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचा भाजप आणि ओवेसींची एमआयएम हे दोन परस्परविरोधी पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
अकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी स्थानिक नेत्यांनी सर्व वैचारिक मतभेद बाजूला सारत भाजप आणि एमआयएमची युती घडवून आणली. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत अकोट नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे, ज्या एमआयएमवर भाजप नेत्यांकडून नेहमीच देशविरोधी आणि जातीयवादी असल्याची टीका केली जाते, त्याच पक्षाशी स्थानिक पातळीवर युती केल्याने भाजपवर जोरदार टीका होत आहे.
फडणवीस संतापले, कारवाईचे संकेत
अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याची माहिती समोर येताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “भाजपची काँग्रेस किंवा एमआयएमसोबतची युती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी स्थानिक नेत्यांना फटकारले आहे. तसेच, या युतीला जबाबदार असणाऱ्या स्थानिक नेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेतही फडणवीस यांनी दिले आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा
या युतीमुळे भाजपच्या तत्वनिष्ठ राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत आणि अकोटमध्ये एमआयएमसोबत जुळवून घेण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. सत्तेसाठी विचारधारा गुंडाळून ठेवली जाते का, असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे.






















