प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे
विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी ५ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाढते तापमान, प्रदूषण आणि घटणारी जैवविविधता यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर जनजागृती करण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल तसेच शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर व तालुक्यात ‘भूपेशभाई ग्रीन आर्मी’च्या माध्यमातून लाखो झाडांचे संवर्धन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात भाजपा ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती जगतसिंग राजपूत आणि भाजपा ग्रामीण सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, माजी सरपंच दीपक राजपूत, माजी सरपंच संजय भिल, ग्रामसेविका मेघना भामरे, भाजयुमोचे निलेश देशमुख, धुडकू भिल, हरी उत्तम भिल, निखिल सिसोदिया यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.























