ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिकलधोकडा-अ-हेररनवरगाव परिसरातील वैनगंगा नदीपात्रातून विनापरवाना रेतीची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अ-हेर-नवरगाव येथील विकास विद्यालय परिसरात अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती ‘ ११२’ वर प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली. वैनगंगा नदीपात्रातून चोरून आणलेली ३ ब्रास रेती आणि तीन ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

या प्रकरणी चालक कृष्णकांत गोवर्धन देवढगले (२६, भालेश्वर), विलास विखार (ब्रह्मपुरी), यश प्रभू बांडे (२०, नांदगाव जानी), मोंटू सहारे (नांदगाव जानी), साहिल कृष्णलाल बर्डे (२१, नांदगाव जानी) आणि कृष्णलाल सहारे (नांदगाव जानी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासनाचा महसूल बुडवून स्वतःच्या फायद्यासाठी रेतीची चोरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, सहायक फौजदार सुदेश कुंभरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बालाजी चव्हाण आणि सहाय्यक फौजदार सुदेश कुंभरे यांनी केली. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले असून, अवैध उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण पिसे करत आहेत. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



















