जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव शहर पोलीस ठाण्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तब्बल ४५ बेवारस वाहने सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या वाहनांचे मूळ मालक शोधण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाने केले असले तरी अद्याप कोणताही मालक पुढे आलेला नाही.
दीर्घकाळ उघड्यावर पडून राहिल्यामुळे या वाहनांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून अनेक वाहनांना गंज लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १३ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्या नागरिकांची वाहने चोरीला गेली आहेत किंवा जप्त वाहनांवर त्यांचा मालकी हक्क, तारण हक्क किंवा विमा हक्क आहे, अशा संबंधितांनी पुढील ६० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निर्धारित मुदतीत कोणीही हक्क सांगितला नाही तर ही सर्व वाहने लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीस काढण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






















