ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी ते उमरखेड दरम्यान धावणारी एसटी बससेवा मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशी सेवा असोसिएशन, ब्रह्मपुरी शाखेच्या वतीने बससेवा पूर्ववत सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
उमरखेड, पुसद, दारव्हा, वणी आणि यवतमाळ या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बससेवा अत्यंत महत्त्वाची होती. मात्र सध्या या मार्गावर ब्रह्मपुरी आगाराची एकही बस नसल्यामुळे प्रवाशांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.
प्रवाशी सेवा असोसिएशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे यांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन देऊन ही सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मागील तीन ते चार वर्षांपासून ही बससेवा नियमित सुरू होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ब्रह्मपुरी आगारालाही या मार्गावरून चांगले उत्पन्न मिळत होते.
मात्र अचानक ही सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना राहुल भोयर, अमरदीप लोखंडे, शरद भानारकर, रमाकांत अरगेलवार यांसह इतर सदस्य उपस्थित होते.






















