Times of Maharashtra Desk: दुबई एअर शो २०२५ च्या शेवटच्या दिवशी एका दुर्दैवी घटनेत भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान कोसळले आहे. या अपघातात भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी हवाई कसरतींचे प्रात्यक्षिक सादर करत असताना ही दुर्घटना घडली.
नेमकी घटना काय?
ही घटना शुक्रवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार साधारण २:१० च्या सुमारास दुबईतील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस विमान हवेत कसरती सादर करत होते. अचानक विमानाने नियंत्रण गमावले आणि ते जमिनीच्या दिशेने वेगाने खाली आले. जमिनीवर आदळताच विमानाचा स्फोट झाला आणि आगीचा मोठा लोळ उठला. घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट आकाशात पसरलेले दिसले. या एअर शोसाठी उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांसमोर हा थरारक अपघात घडला.
वैमानिकाचा मृत्यू
सुरुवातीला वैमानिकाच्या स्थितीबद्दल संदिग्धता होती, परंतु त्यानंतर भारतीय हवाई दलाने अधिकृत माहिती देत वैमानिकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. हवाई दलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आज दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान आयएएफच्या तेजस विमानाला अपघात झाला. या अपघातात वैमानिकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतीय हवाई दल या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.’
एक दिवस आधीच्या अफवा आणि वस्तुस्थिती
या अपघाताच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर तेजस विमानाबाबत काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये विमानातून ऑईल लीक होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, संरक्षण मंत्रालयाने हे दावे फेटाळून लावत ते फेक न्यूज असल्याचे स्पष्ट केले होते. ते दृश्य ऑईल लीकचे नसून दमट हवामानामुळे होणारे वॉटर ड्रेनेज होते, जे विमानासाठी एक सामान्य प्रक्रिया आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. दुर्दैवाने, या स्पष्टीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी हे विमान अपघातग्रस्त झाले.
तेजसच्या इतिहासातील दुसरी दुर्घटना
भारताने स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचा हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी मार्च २०२४ मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तेजस विमान कोसळले होते. त्या घटनेत सुदैवाने वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला होता. तेजस हे भारताचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान असून, ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ने विकसित केले आहे.
भारतीय हवाई दलाने या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. हे तांत्रिक बिघाड होते की मानवी चूक, हे तपासांती स्पष्ट होईल.






















