मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी
जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची मागणी निसर्ग मित्र समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. मात्र, होळी निमित्ताने मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि पाण्याची नासाडी चिंतेची बाब आहे. त्यामुळे ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान प्रभावीपणे राबवून पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय उपक्रमाला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
हे अभियान शासनामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात यावे. त्यासाठी जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी, तसेच गावपातळीवरील सरपंच व ग्रामसेवक यांना आवश्यक सूचना देऊन नागरिकांना पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत जनजागृती करावी. गाव व शहर पातळीवर वृक्षांचे संवर्धन करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, राज्य उपाध्यक्ष सुभाष बिंदवाल (जामनेर), जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष नामदेवराव तुपे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर. आर. सोनवणे, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरसिंग दिपला पाटील, बी. एस. मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ही माहिती संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील व जिल्हा संपर्क प्रमुख विनोद पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
















