बबनराव नांगरे ( बुलढाणा : देऊळगाव राजा प्रतिनिधी ) : तालुक्यातील आळंद परिसरात विजेचा तुटलेला तार लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१५ मार्च २०२६) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्रुबा ज्ञानबा घुले (वय ५५, रा. खापरखेडा, ता. लोणार, जि. बुलढाणा) हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून आळंद येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होते. त्यांनी आळंद, ता. देऊळगाव राजा परिसरात शेती ठोक बटाईने घेतली होती. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.
दरम्यान, शेतातून वरून गेलेल्या वीजवाहिनीचा तार तुटून जमिनीवर पडलेला होता. पिकांना पाणी देताना अश्रुबा घुले यांचा त्या तुटलेल्या ताराला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ही घटना आळंद फाटा येथील गणपती मंदिराजवळील शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मृत अश्रुबा घुले यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून तुटलेल्या वीजवाहिन्यांबाबत वीज वितरण विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.






















