Times of Maharashtra Desk: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यभरातून मागणी होत असताना मुख्यमंत्री सहायता निधीत (CM Relief Fund) आर्थिक मदत जमा करण्याचे आवाहन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या मदतनिधीतून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले होते. परंतु आरटीआयमधून समोर आलेल्या आकडेवारीमुळे आज विधिमंडळात गदारोळ निर्माण झाला आहे.
माजी विधानपरिषद सभापती अंबादास दानवे यांनी धक्कादायक माहिती ट्विट करत सांगितले की, राज्यातील नागरिकांनी केवळ ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीत शेतकऱ्यांसाठी अब्जावधी रुपये जमा केले, मात्र सरकारने फक्त 75 हजार रुपयेच खर्च केले. “हा निधी अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी आहे; पण सरकारला बहुधा हा उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?” असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून तत्काळ स्पष्टीकरण देण्यात आले. सीएमओने दानवे यांच्या दाव्यांचा पूर्ण फेटाळून लावले असून, ही माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले आहे.
“माहिती चुकीची, फक्त एका महिन्याची आकडेवारी” – सीएमओचे उत्तर
सीएमओने स्पष्ट केले की, केवळ ऑक्टोबर महिन्याची अपूर्ण आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण केला जात आहे.
त्यांनी माहिती देताना सांगितले की ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधीतून एकूण ₹61 कोटी 51 लाख 6९८ रुपये वितरित करण्यात आले आहेत.दैनंदिन पातळीवर निधी खर्च केला जातो, त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती देणे दिशाभूल करणारे आहे.शेतकऱ्यांना फक्त मुख्यमंत्री सहायता निधीतूनच नव्हे, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्यांमधूनही आर्थिक मदत दिली जाते.सीएमओने हेही सांगितले की दानवे यांनी ज्या आकडेवारीचा उल्लेख केला आहे, ती का आणि कशी चुकीची दिली गेली याची चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कारवाई केली जाईल.

आरटीआयमधून काय समोर आले?
आरटीआयद्वारे समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार,मराठवाड्यातील महापुरानंतर शेतकऱ्यांसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या होत्या. त्यानुसार 100 कोटी रुपये निधीमध्ये जमा झाल्याचे नमूद होते, परंतु त्यापैकी फक्त 75 हजार रुपयेच वितरित झाले, असा दावा करण्यात आला. याच मुद्द्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली.
शेतकऱ्यांच्या खात्यात 14,000 कोटी जमा – सीएमओ
राज्य सरकारने स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे. अतिवृष्टी, शेतकरी मदत आणि निधी वितरणावरून सुरू झालेला वाद आता तीव्र झाला असून, या प्रकरणी आगामी विधिमंडळ अधिवेशनात आणखी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






















