Times of Maharashtra Desk: बऱ्याच वर्षानी मुंबई की बॉम्बे हा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. हा वाद केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झाला आहे. त्या कार्यक्रमात ते म्हणाले “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार मानतो” त्यांच्या या व्यक्तव्याने पुन्हा एकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय.
या आधी देखील महाराष्ट्र नव निर्माण सेनेने 2009 साली प्रदर्शित झालेल्या “वेक अप सीड” या चित्रपटात मुंबई ऐवजी बॉम्बे शब्द उच्चारल्यामुळे आवाज उठवला होता. त्यानंतर या प्रकरणात करण जोहरला माफी देखील मागावी लागली. आता राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या व्यक्तव्यवर देखील मनसे आक्रमक झाली असून हा वाद पुन्हा एकदा वाढला आहे.
नेमक प्रकरण काय?
राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटी उद्घाटन करण्यासाठी जितेंद्र सिंह मुंबई आयआयटीमध्ये उपस्थित असून त्यांनी या प्रसंगी भाषण केलं.भाषणात ते म्हणाले ‘आपण देवाचे आभार मानतो की आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही. म्हणजे ज्या प्रकारे आयआयटी मद्रास हे नाव तसेच राहिले, तसेच आयआयटी बॉम्बे चे सुद्धा राहीले’ त्याच्या या व्यक्तव्याने हा वाद पुन्हा एकदा बाहेर आला आहे.
सरकारला मुंबई हे नाव खटकतंय – मनसे नेते राज ठाकरे आक्रमक
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या व्यक्तींवर राज ठाकरे यांनी ट्विट करत टीका केली आहे. सरकारला मुंबई हे नाव खटकतंय… मुंबई ऐवजी बॉम्बे नाव त्यांना करायचं आहे. मुंबई आणि हळूहळू एमएमआर गुजरातला जोडायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मराठी माणसांना हे कळायला हवं अशी त्यांनी पोस्ट केली आहे. तर मनसेकडून रात्री मुंबई आयआयटीच्या गेटसमोर आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई असे बॅनर लावण्यात आले.
आयआयटी बॉम्बे हे नाव बदलू शकते का?
आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई असे बॅनर लावल्यामुळे आता हे नाव बदलणार का असा प्रश्न सर्वाना पडला आहे. आयआयटी बॉम्बे हे संसदेच्या कायद्याने स्थापित केलेल्या आयआयटींपैकी एक आहे. शिवाय विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत आयआयटी मुंबईचे करार आहेत. त्यामुळे नावात बदल करायचा झाल्यास कायद्यात सुधारणा करावी लागेल त्यामुळे आयआयटी बॉम्बेचं नाव लगेच तातडीने आयआयटी मुंबई करून बदलणे जरी शक्य नसलं तरी मुंबई आणि बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही मागणी आता वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईचे राजकारण देखील तापलेले दिसत आहे.






















