Times of Maharashtra Desk : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन आणि परखड विचारांसाठी ओळखले जातात. मात्र, सध्या ते त्यांच्या कन्येच्या शाही साखरपुड्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी कीर्तनातून नेहमीच लग्नसमारंभातील अनावश्यक खर्चावर टीका करत साधेपणाचा संदेश दिला आहे. परंतु, त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साहिल चिलप यांच्यासोबत ४ नोव्हेंबर रोजी संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्ञानेश्वरी आणि साहिल या भावी वधू-वरांनी सोहळ्याच्या ठिकाणी रथातून प्रवेश केला. अत्यंत महागडा आणि नेत्रदीपक हॉल, आकर्षक सजावट आणि ट्रे भरून सोन्याचे दागिने दिल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे, ज्यामुळे सोहळ्याच्या ‘शाही’ थाटाची चर्चा सुरू झाली आहे.
इंदूरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून नेहमीच “लग्न साध्या पद्धतीने करा, कर्ज काढून खर्च करू नका,” अशा प्रकारचा उपदेश देत असतात. मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर टीका करताना म्हणाले की , “दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी वागायला हवे होते. त्यांच्या कृतीतून समाजात चुकीचा संदेश गेला आहे.”
टीकेवर इंदुरीकर महाराजांचे स्पष्टीकरण
या संपूर्ण वादावर इंदुरीकर महाराजांनी साखरपुडा सोहळ्यादरम्यान टीकाकारांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “वीस वर्षे लोकांनी नावं ठेवली, ते सहन करत आलो. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे, आपण बदल घडवू शकतो आणि बदल घडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, कार्यक्रमात महाराष्ट्रीयन जेवणच ठेवले होते. जेवण वाढणाऱ्यांचा पोशाखही वारकरी पद्धतीचा होता. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, त्यांनी या कार्यक्रमात ‘व्याही भेट‘ हा कार्यक्रम बंद केला आणि कोणत्याही पाहुण्याचा सत्कार सोहळा ठेवला नाही. सत्कार सोहळा टाळून, त्यातून वाचलेले एक लाख अकरा हजार रुपये त्यांनी महापूरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दान केले आहेत.
एकंदरीत, या शाही साखरपुडामुळे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या कीर्तनात ते मांडत असलेले विचार आणि प्रत्यक्ष कृती यावरून समाजमाध्यमात दोन गट पडलेले दिसून येत आहेत.






















