जळगाव (प्रतिनिधी : विनोद सुधाकर पवार): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना गौरविण्यात आले. यावेळी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले. जळगाव जिल्हा प्रशासनाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले. प्रशासनातील पारदर्शकता, डिजिटल कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवा यामुळे जिल्ह्याने हे यश संपादन केले.
या यशामागे सात महत्त्वाची सूत्रे निर्णायक ठरली. त्यामध्ये अधिकाऱ्यांसाठी स्पष्ट उद्दिष्टे व मूल्यमापन, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिसचा १०० टक्के वापर, कामकाजाच्या देखरेखीसाठी डिजिटल डॅशबोर्ड, नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे सेवा, एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर तसेच जीआयएस प्रणालीद्वारे योजनांची अंमलबजावणी या बाबींचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांना जलद, पारदर्शक व प्रभावी सेवा देण्याच्या उद्दिष्टाने आम्ही सातत्याने काम केले. जिल्हा प्रशासनाचे हे यश संपूर्ण जळगावकरांना समर्पित आहे.”
जळगाव जिल्ह्याच्या या यशामुळे प्रशासनिक कार्यक्षमता आणि डिजिटल परिवर्तनातील प्रगती अधोरेखित झाली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी हा एक आदर्श ठरत आहे.






















