विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : येथे दि. १ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन उत्साहात पार पडले. निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आबासो रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला.
उद्घाटन आमदार किशोर दराडे, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन व दीपप्रज्वलनाने झाले. पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, फटाकेमुक्त दिवाळी, शाडू मातीच्या गणेशमूर्ती, प्रदूषण नियंत्रण दिवस आदी उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञाही देण्यात आली.

कार्यक्रमात राज्यातील ५० जणांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार धुळे येथील शशिकांत भदाणे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश अमृत पाटील व सेवानिवृत्त वन अधिकारी प्रभाकर वाघ यांना प्रदान करण्यात आला. तसेच विविध जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, उद्योजक व अधिकारी यांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन आर. आर. सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी दिली.






















