Times of Maharashtra Desk, Pune: जुन्नर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे बिबट -मानव संघर्षाचे प्रमाणही वाढले आहे. याच मालिकेतील एक गंभीर घटना गुरुवारी रात्री आळेफाटा येथील वडगाव आनंद परिसरात घडली. वडगाव आनंद परिसरातील रानमळा येथे राहणाऱ्या, एकोणीस वर्षीय प्रणव नामदेव शिंदे नामक तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला. प्रणव रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा येथून कामावरून घरी परतत होता . या हल्ल्यामध्ये प्रणव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव आळेफाटा येथील आपले काम आटोपून गुरुवारी रात्रीच्या वेळी आपल्या मोटारसायकलवरून वडगाव आनंद परिसरतील आपल्या घराकडे परत येत होता. रात्री साधारण साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तो वडगाव आनंद हद्दीतील पिंपळगाव जोगा कॅनॉलजवळच्या रस्त्याने जात असताना, रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे प्रणव मोटारसायकलवरून खाली पडला. मोटारसायकलवरून पडल्यानंतर त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर हल्ला कायम ठेवला. या हल्ल्यात बिबट्याने त्याच्या हाताला चावा घेतला. यानंतर आरडाओरड झाल्याने बिबट्या जवळच्या ऊसाच्या शेतात पळून गेला. प्रणवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या हाताच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत.
” जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील आळेफाटा, आळे, राजुरी, बोरी बुद्रुक, उंचखडक , बोरी खुर्द, जाधववाडी, कोळवाडी, संतवाडी, वडगाव कांदळी, वडगाव आनंद आदी गावामंध्ये बागायती व ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने अनेक वेळा दुचाकीस्वारांवर, पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असुन राजुरी या ठिकाणी सोमवारी एक विद्यार्थी बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गावात एका मेंढपाळाच्या मेंढीवर हल्ला करून बिबट्याने ठार केले आहे. दिवसेंदिवस माणसांवर तसेच पाळीव प्राण्यांना हल्ले वाढत चालले असून वनविभागाने यावर काहीतरी ठोस पावले उचलावी तसेच बिबट बहुल क्षेत्रामध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.”
स्नेहल शेळके, माजी जि.प. सदस्या
या घटनेमुळे वडगाव आनंदसह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे नागरिकांना धोकादायक वाटू लागले आहे. या भागामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून, शेतातील कामे तसेच रस्त्यावरून एकटे प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पाऊलखुणा आणि हल्ल्याच्या जागेची पाहणी केली असून, या बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची तसेच शोधमोहीम राबवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.






















