Times of Maharashtra Desk, Pune: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात पार पडलेल्या एका विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन,पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश बनले आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती बी.आर. गवई हे सरन्यायाधीश पदी होते. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या सोहळ्यात एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. मावळते सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी पदावरून पायउतार होताना, नवीन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी आपली अधिकृत गाडी राष्ट्रपती भवनात सोडली. सत्तेच्या हस्तांतरणासोबतच हा एक सौजन्याचा आणि परंपरेचा भाग म्हणून पाहिले जात आहे.
नवीन सरन्यायाधीशांसमोरील आव्हाने
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्यासमोर अनेक महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. कायदेतज्ज्ञ आणि नागरिक त्यांच्याकडून एका ठोस फाईव्ह पॉइंट ॲक्शन प्लॅनची अपेक्षा करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित खटल्यांचा वेगवान निपटारा करणे, न्यायिक नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता, सर्वसामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ करणे या गोष्टींचा समावेश असू शकतो.



















