जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : दिल्लीत कोळी महासंघाच्या महत्वपूर्ण प्रश्नाची दखल घेतली गेल्याने महाराष्ट्रातील बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार लोकनेते श्री. रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयाला गती मिळाली आहे. महाराष्ट्रातील काही बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रकरण प्रलंबित राहिल्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ रोखण्यात आले होते. या गंभीर समस्येकडे कोळी महासंघाने लक्ष वेधले.
या पार्श्वभूमीवर श्री. रमेश दादा पाटील आणि कोळी महासंघाचे नेते श्री. सुभाष कोळी यांनी दिल्ली येथे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती देत कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली. केंद्रीय मंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेत त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील प्रभावित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी कोळी महासंघाच्या प्रयत्नांचे स्वागत करत लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय मंत्र्यांना सकारात्मक पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले असल्याची नोंद घेण्यात आली.
एकूणच, कोळी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.






















