Times Of Maharashtra Desk:महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पाच जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषद- यांचा कार्यकाल १३ मे रोजी संपणार.
महाराष्ट्र विधानपरिषद ही कायमस्वरूपी सभागृह असून तिची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. सध्या ५५ सदस्य कार्यरत असून २३ जागा रिक्त आहेत. दरम्यान, १४ मे २०२६ रोजी आणखी ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या जागा विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिलेल्या सदस्यांच्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे.
सध्या विधानसभेत २८६ आमदार असल्यामुळे या निवडणुकीत अंदाजे ३६ आमदारांचा मतदानाचा कोटा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून राजकीय गणिते मांडली जात आहेत.
विधानपरिषदेच्या रचनेनुसार, ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडले जातात. शिक्षक मतदारसंघातून ७, पदवीधर मतदारसंघातून ७ सदस्य निवडले जातात, तर साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
राज्यसभा – यांचा कार्यकाल संपणार!
दरम्यान, राज्यसभेच्याही निवडणुकीचे गणित रंगू लागले आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ जागा २ एप्रिल २०२६ रोजी रिक्त होणार आहेत. यात शरद पवार, रामदास आठवले , भागवत कराड, धैर्यशील पाटील प्रियंका चतुर्वेदी , रजनी पाटीलआणि फौजिया खान यांचा समावेश आहे.
विधानपरिषद आणि राज्यसभा या दोन्ही पातळ्यांवरील रिक्त जागांमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता असून, विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.






















