Times of Maharashtra Desk: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर भाजप-शिवसेना युतीने कल्याण डोंबिवली महापालिकेत (KDMC) मोठी आघाडी घेतली आहे. 122 सदस्यसंख्या असलेल्या केडीएमसीमध्ये एकूण 9 उमेदवार बिनविरोध विजयी ठरल्याने महायुतीला मतदानापूर्वीच सत्ता स्थापनेच्या दिशेने मोठा पाऊल टाकता आले आहे.
यापैकी भाजपचे 5 आणि शिवसेना (शिंदे गट) चे 4 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे महायुतीला सत्तेच्या आवश्यक 62 जागांपासून केवळ 53 जागांची दूरवर आहे. भाजपच्या या यशामागे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसते, तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी सुद्धा यशस्वी झाली आहे.
भाजपची विजयी घोडदौड
भाजपच्या उमेदवारांमध्ये रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मन्दा पाटील आणि ज्योती पवन पाटील यांचा समावेश आहे. ज्योती पवन पाटील यांच्या विजयानंतर भाजपाचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
शिवसेनेचा दमदार खेळ
शिवसेनेच्या शिंदे गटानेही आपली ताकद सिद्ध केली. रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी आणि हर्षल राजेश मोरे हे 4 उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे ह्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
राज्यात महायुतीच्या बिनविरोध विजयाचा आकडा
राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुतीला फायदा झाला आहे. भाजपने धुळे महापालिकेत 2, पनवेल महापालिकेत 1 जागा बिनविरोध मिळवली, तर शिंदे गटाने केडीएमसीत 4 आणि जळगाव महापालिकेत 1 जागा बिनविरोध जिंकली. तसेच, अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या उमेदवाराला एक जागा बिनविरोध मिळाली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत. भाजप-शिवसेना महायुतीच्या या यशामुळे आगामी मतदानापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची दिशा निश्चित झाली आहे.






















