Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केला आहे. अशा लॅबमधून चुकीचे रिपोर्ट दिले जात असून, त्यावर आधारित चुकीचे निदान व उपचार होतात. परिणामी रुग्णांना अनाठायी मृत्यूला सामोरे जावे लागते तसेच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो, असे त्यांनी म्हटले आहे.
दि. ९ जुलै २०२४ रोजी विधानसभेत ‘मुंबई शहरातील बनावट पॅथॉलॉजी लॅबद्वारे नागरिकांची फसवणूक’ या प्रश्नावर चर्चा झाली होती. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी अवैध लॅब चालकांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
सुप्रीम कोर्टाचा आदेश तरीही…
Supreme Court of India यांनी १२ डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या निकालानुसार लॅबोरेटरीचे रिपोर्ट फक्त पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांकडून प्रमाणित करणे बंधनकारक आहे. पॅथॉलॉजिस्टशिवाय लॅब चालवणे हे Maharashtra Medical Practitioners Act, 1961 च्या कलम ३३ नुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरतो.
Maharashtra State Human Rights Commission यांनी २२ जानेवारी २०१८ च्या आदेशात तंत्रज्ञांच्या लॅबमधून जनतेची लूट होत असल्याचे नमूद करून २४ मे २०१६ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची शिफारस केली होती. मात्र ती अद्याप लागू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी बोगस लॅब वर गुन्हे
कराड, फलटण, वडूज, नागपूर आदी ठिकाणी पॅथॉलॉजिस्टशिवाय लॅब चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही ठिकाणी पॅथॉलॉजिस्टच्या नावाचा गैरवापर करून विमा कंपन्यांची व शासनाची फसवणूक झाल्याचेही उघड झाले आहे.
राज्यातील सर्व जिल्हा व महानगरपालिका बोगस डॉक्टर समित्यांनी तातडीने सर्व लॅबचे सर्वेक्षण करून बेकायदेशीर लॅब चालकांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच मानवी हक्क आयोगाच्या शिफारशी व विधानसभेतील आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
















