दूधवाही येथील प्रवीण मेश्राम यांच्या बागेत आंब्यांचा बहर; एकाच फांदीला लागली १५ फळे
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : यंदाच्या कडाक्याच्या उन्हात आणि निसर्गाच्या लहरीपणामध्येही ब्रह्मपुरी तालुक्यातील दूधवाही येथील प्रयोगशील शेतकरी प्रवीण मेश्राम यांच्या आमराईत निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळत आहे. मेश्राम यांच्या बागेतील एका आंब्याच्या झाडाला इतका प्रचंड बहर आला आहे की, चक्क एकाच फांदीला १५ आंबे लागले असून दुसऱ्या फांदीला ५ आंबे डोलत आहेत.
दूधवाही गावातील प्रगतशील शेतकरी प्रवीण मेश्राम यांनी आपल्या बागेत आंब्यांची मोठ्या कष्टाने जोपासना केली आहे. साधारणपणे आंब्याच्या एका मोहोरानंतर काही फळे गळून पडतात, मात्र मेश्राम यांच्या झाडावरील एकाच फांदीला तब्बल १५ आंबे सुरक्षितपणे वाढताना दिसत आहेत. त्याच झाडाच्या दुसऱ्या लहान फांदीला ५ आंबे आहेत. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने फळे लागल्याने हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.
मेश्राम यांनी या झाडांची योग्य निगा, वेळेवर पाणी आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यानेच हा उत्तम निकाल मिळाल्याचे बोलले जात आहे. ‘निसर्गाची ही किमया पाहून आनंद वाटतो, कष्टाचे फळ अशा स्वरूपात मिळाल्याने समाधान आहे’, अशी भावना प्रवीण मेश्राम यांनी व्यक्त केली.
ब्रह्मपुरी परिसरात सध्या या ‘केसर’ ‘ आंब्याच्या झाडाची आणि मेश्राम यांच्या बागेची मोठी चर्चा सुरू आहे.






















