Times of Maharashtra Desk: नाशिक जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. मंगळवारी दिलेल्या या निकालानंतर आज बुधवारी दिनक १७ डिसेंबर म्हणजेच दुसऱ्या दिवशी कोकाटेंच्या अटकेच्या हालचालींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास अटक अटळ मानली जात आहे. तसेच अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी कोकाटे प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, असे अजित पवारांना सांगितल्याचे समजते. भेटीनंतर अजित पवार हे मंत्रालयात नियोजित मंत्रिमंडळ बैठकीसाठी रवाना झाले. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता आहे.या बैठकीला माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, याच बैठकीत कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पक्ष सध्या राजीनाम्याच्या बाजूने नसला, तरी अटक वॉरंट निघाल्यास पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंटसाठी अर्ज
माणिकराव कोकाटे यांच्या नावाने अटक वॉरंट काढण्यासाठी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज सादर केला असून, आज यावर सुनावणी होणार आहे. न्यायालय या अर्जावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे.
कोणत्या प्रकरणात झाली शिक्षा?
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीत माणिकराव कोकाटे यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटासाठी राखीव सदनिका मिळवली होती. मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या या सदनिका कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी घेतल्या होत्या.या सदनिका वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे व त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती.या निकालाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अपील फेटाळले. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.






















