Times Of Maharashtra Desk : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर शहरातील राजकारणाला मोठा आणि वादग्रस्त कलाटणी मिळाली आहे. मराठी महापौर या अस्मितेच्या मुद्द्यावर पेटलेला संघर्ष आता थेट निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांचा महापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने, एमएमआरमधील पहिला अमराठी महापौर मीरा-भाईंदरला मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
या घडामोडीमुळे शहरातील मराठी समाजात तीव्र अस्वस्थता पसरली असून, मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक भूमिकेत उतरले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून सातत्याने महापौर मराठीच असावा अशी ठाम मागणी लावून धरली जात होती. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता. मात्र, भाजपने थेट डिंपल मेहता यांचे नाव पुढे करून हा इशारा झुगारल्याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. विशेष म्हणजे, उपमहापौरपदासाठी भाजपने ध्रुवकिशोर पाटील यांचे नाव जाहीर केले आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
मराठी माणसाचा वापर फक्त मतांसाठीच होतो का? असा थेट आणि बोचरा सवाल मराठी एकीकरण समितीने उपस्थित केला आहे. मराठी अस्मितेला डावलल्याचा आरोप करत, भाजपच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, येत्या 3 तारखेला नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा सक्रिय सहभाग असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एमएमआरमध्ये पहिल्यांदाच अमराठी महापौर होण्याच्या शक्यतेमुळे मीरा-भाईंदरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आगामी आंदोलन किती तीव्र होणार? भाजप आपल्या भूमिकेवर काय स्पष्टीकरण देणार?
याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






















