Times of Maharashtra Desk: महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ वॉर्ड क्रमांक 203 मधून ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने सकपाळ नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीवर स्पष्टीकरण देताना दगडू सकपाळ म्हणाले की, “मी आजारी आहे, ही बाब कळाल्यानंतर माझी प्रकृती विचारण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते. यामागे दुसरा कोणताही राजकीय हेतू नाही. त्यांच्या सोबत राणेंचे चिरंजीव आणि देवरांचे चिरंजीवही उपस्थित होते.”दरम्यान, पक्षातील नाराजी स्पष्ट करताना सकपाळ म्हणाले, “जोपर्यंत गरज होती तोपर्यंत पक्षासाठी काम केलं. आता गरज संपली आहे, त्यामुळे पक्षाकडून विचारणाही होत नाही. किमान एक फोन आला असता तरी समाधान झालं असतं. पण पक्षाकडून कोणतीच दखल घेतली जात नसेल तर घरी बसलेलं बरं.”
तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “मी पक्षाबाबत नाराज आहे, पण मातोश्रीबाबत काहीही बोलणार नाही. जे काही मिळालं ते त्यांच्या आशीर्वादामुळेच. मी फक्त मुलीसाठी एक जागा मागितली होती. पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा दिल्या, त्यांनी कधी पक्षासाठी रक्त सांडलं आहे का, अशी खंत आहे.”भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत बोलताना दगडू सकपाळ यांनी सध्या तरी कुठेही जाण्याचा विचार नसल्याचं सांगितलं. मात्र, “कुणाला गरज वाटली तर पुढे विचार करू,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.






















