Times of Maharashtra Desk : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी 21 डिसेंबरला जाहीर करावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिले. नियोजित कार्यक्रमानुसार मतदान आज पार पडत असून उद्या निकाल जाहीर होणार होते. मात्र, आरक्षण मर्यादा विषयक अडचणीमुळे पुढे ढकललेल्या 24 नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे आता सर्व ठिकाणांचे निकाल एकत्रितपणे घोषित केले जातील. या निर्णयामुळे उद्याच निकालाची तयारी करणाऱ्या सत्ताधारी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुल्या शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
उमेदवार मेहनत करतात, प्रचार करतात; परंतु यंत्रणेच्या त्रुटींमुळे त्यांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागतो, हे अयोग्य आहे. – देवेंद्र फडणवीस
निवडणूक निकल पुढे ढकळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले “गेल्या 25-30 वर्षांत मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आलो आहे, पण घोषित झालेल्या निवडणुका आणि त्यांचे निकाल पुढे ढकलले जात आहेत, हे प्रथमच पाहतो आहे. ही पद्धत योग्य वाटत नाही. मात्र, उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्थान असल्याने त्यांचे निर्णय सर्वांना मान्य करावे लागतात.” ,त्यांनी पुढे सांगितले की, उमेदवार मेहनत करतात, प्रचार करतात; परंतु यंत्रणेच्या त्रुटींमुळे त्यांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागतो, हे अयोग्य आहे.
फडणविसंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
“मी याला चूक म्हणणार नाही; पण कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. अनेक वकिलांशी सल्लामसलत करून मी नियम समजून घेतले आहेत. ज्या ठिकाणी सर्व नियमांचे पालन झाले आहे, तिथे फक्त कोर्टात गेल्यामुळे निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही. 284 पैकी फक्त 24 ठिकाणी प्रक्रिया बाकी असताना सर्व मतमोजणी पुढे ढकलणे तत्त्वतः स्वीकारार्ह नाही.” असे म्हणत त्यांनी आयोगावर कायदेशीर अर्थाच्या चुकीचा आरोप केला असून ते म्हणाले की, त्यांची नाराजी निवडणूक आयोगावर नसून कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याबाबत आहे.
आगामी निवडणुकांसाठी सुधारणा करण्याची सूचना
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात पुढे आणखी अनेक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करून अशा परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नयेत, याची काळजी घ्यावी.






















