Times of Maharashtra Desk : देशभरात चर्चेत असलेल्या ‘संचार साथी’ अॅपवरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावर भाष्य केले आहे आहे. त्यांनी हे स्पष्ट केले की हे अॅप नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी नसून, ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.सिंधिया म्हणाले, “हे अॅप पूर्णपणे ऐच्छिक आहे. वापरायचे नसेल तर तुम्ही ते सक्रिय करण्याची किंवा फोनमध्ये ठेवण्याची गरज नाही. इच्छेनुसार ते हटवू शकता.
त्यांनी स्पष्ट केले की सरकारची जबाबदारी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याची आहे आणि ‘संचार साथी’ त्याच उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
प्रियंका गांधींचा आरोप : “हे हेरगिरी करणारे अॅप
या आधी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या अॅपवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. हे “हेरगिरी करणारे अॅप असल्याचा आरोप त्यांनी केला होता. दूरसंचार विभागाने सर्व नवीन मोबाइल हँडसेटमध्ये ‘संचार साथी’ पूर्व-स्थापित करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली.त्या म्हणाल्या,
“नागरिकांना गोपनीयतेचा अधिकार आहे. कुटुंबीयांना किंवा मित्रांना संदेश पाठवताना सरकार पाहत आहे, हे योग्य नाही. सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “लोकशाहीत चर्चा आवश्यक असते, पण सरकार कोणत्याही विषयावर चर्चा टाळत आहे. विरोधकांना दोष देणे सोपे आहे, परंतु चर्चा थांबवणे हे लोकशाहीविरोधी आहे.”
“सायबर सुरक्षा महत्त्वाची, पण प्रत्येकाच्या फोनमध्ये घुसखोरी योग्य नाही” — प्रियंका गांधी
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी असेही स्पष्ट केले की फसवणूक रोखण्यासाठी मजबूत यंत्रणा असावी, परंतु त्याच्या नावाखाली प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही.त्या म्हणाल्या, “सायबर सुरक्षेबाबत आम्ही नेहमी चर्चा केली आहे, परंतु त्यासाठी गोपनीयतेवर आक्रमण होऊ नये. मला वाटत नाही की कोणताही नागरिक याबाबत समाधानी असेल.”
एका बाजूला सरकार हे अॅप नागरिकांच्या सुरक्षेसाठी असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सरकारवर हेरगिरीचे गंभीर आरोप करत आहे.दोन्ही बाजूंची मते समोर आल्यानंतर ‘संचार साथी’ अॅपभोवतीचा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















