Times Of Maharashtra Desk : पुणे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता, लाखो चाहत्यांचा पाठिंबा आणि वेगळी स्टाईल असूनही शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी अवघ्या ३०० मतांनी पराभव केला.
शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गणातून ही लढत झाली. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या निर्मला नवले यांची जादू यावेळी मतपेटीपर्यंत पोहोचू शकली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निर्मला नवले या सोशल मीडियावरील त्यांच्या रिल्स, व्हिडीओ आणि वेगळ्या अंदाजामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे आणि कृतीकडे चाहत्यांचे लक्ष असते. इंस्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांचे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीतही त्या बाजी मारतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
निर्मला नवले यांनी आयटी इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतले असून काही वर्षांपूर्वी त्या कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. उच्चशिक्षित, आत्मविश्वासू आणि आधुनिक विचारांची नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. मात्र, या वेळी मतदारांनी वेगळा कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण २९९ जागांपैकी ७३ जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २७, भाजपचे २०, शिवसेनेचे ७, ठाकरे गटाचे २ आणि शरद पवार गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर थंडावला होता. कोणतीही मोठी सभा झाली नव्हती. मात्र, या पार्श्वभूमीवरही पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात सहानुभूती मिळताना दिसत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक यामधील फरक पुन्हा एकदा या निकालातून स्पष्ट झाल्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.






















