Times Of Maharashtra Desk : धाराशिव राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना धाराशिव जिल्ह्यातील निकालांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः ढोकी पंचायत समितीतील एका मताने झालेल्या विजयाने निवडणूक इतिहासात नोंद घेण्यासारखा क्षण निर्माण झाला आहे.
ढोकी पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे यांनी भाजपच्या निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. अमर समुद्रे यांना ३,१८७ मते, तर निहाल काझी यांना ३,१८६ मते मिळाली. एका मताच्या फरकामुळे अखेरपर्यंत निकालावर सस्पेन्स कायम राहिला होता.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत दोन्ही उमेदवारांमध्ये मतांची तफावत अत्यंत कमी होती. शेवटची फेरी पूर्ण होईपर्यंत कोण बाजी मारणार याबाबत अनिश्चितता होती. अखेर निकाल जाहीर होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत हा विजय साजरा केला. या थरारक लढतीने धाराशिव जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.
दरम्यान, परंडा तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातही अत्यंत महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळाली. माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी २,१८७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना भाजपचा पाठिंबा होता.
जवळा गटाची लढत ही जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतील लढतींपैकी एक ठरली. भूम-परंडा-वाशी हा मतदारसंघ माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केला होता.
या गटात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या देखील निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे ही लढत केवळ स्थानिकच नव्हे, तर जिल्हा पातळीवरील प्रतिष्ठेची मानली जात होती.
ढोकीतील एका मताचा थरार आणि जवळा गटातील बंडखोरीतून मिळालेला विजय या दोन्ही निकालांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, आगामी स्थानिक राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.






















