दररोज कामावर जाण्यासाठी अनेक नोकरदार मेट्रोचा वापर करत आहेत. मात्र स्थानकाजवळ वाहनतळ नसल्यामुळे त्यांना दुचाकी पदपथावर लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस पदपथावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत असून, वाहनधारकांना दरवेळी ७०० ते ८०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
महिन्यातून दोन ते तीन वेळा तरी हा दंड भरावा लागतो, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. मेट्रोच्या सोयीमुळे वेळ आणि पैसे वाचतील, या अपेक्षेने नागरिक मेट्रोकडे वळले, मात्र वाहनतळाच्या सुविधेअभावी त्यांना वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image below👆👆
महापालिकेने अद्याप मेट्रो स्थानक परिसरात कोणतीही अधिकृत पार्किंग व्यवस्था केलेली नाही. उलट, ‘नो पार्किंग’चे फलक लावून वाहने हटवण्यात येत आहेत. वाहनतळाची कोणतीही सोय न करता अशाप्रकारे कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
मेट्रो सेवा सुरू करताना स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व मेट्रो स्थानकाजवळ तातडीने अधिकृत वाहनतळाची सोय करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तसेच, जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही, तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई न करता नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मेट्रो प्रवाशांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.























