Times of Maharashtra Desk, Pune : पुणे शहरात वारजे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे, पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचे अवशेष नष्ट करण्यासाठी मृतदेह चक्क एका लोखंडी भट्टीमध्ये जाळल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून त्याचे नाव समीर जाधव असे आहे. खून झालेल्या पत्नीचे नाव अंजली जाधव असल्याची माहिती आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. याच वादातून आरोपी समीर जाधव याने आपली पत्नी अंजली हिचा निर्घृण खून केला. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी समीर याने अंजलीचा मृतदेह एका लोखंडी भट्टीमध्ये टाकला आणि जाळला. नंतर तो स्वत:च वारजे पोलिसांकडे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेला. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेगाने तपास केल्यानंतर त्यांना समीर जाधवचा संशय आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्यानेच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी पती समीर जाधव याला अटक केली आहे.
या भयंकर घटनेने वारजे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या क्रूर हत्येने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. घटनेचा अधिक तपास सुरू असून, आरोपीने हा गुन्हा कोणत्या कारणास्तव केला आणि त्याला आणखी कोणी मदत केली का, याचा पोलीस शोध घेत आहेत.






















