Times of Maharashtra Desk: पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आतापर्यंत झालेल्या बैठका, चर्चा आणि जागावाटपामध्ये अपेक्षित तोडगा निघाल्यामुळे काही गैरसमज निर्माण झाले होते.
शिवसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पक्षातील ७० ते ८० जणांनी आज फॉर्म भरले आहेत. त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. उर्वरीत ठिकाणी देखील आज फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.” या घोषणेनंतर पुण्यात भाजप-शिवसेना युती तुटली आहे अशी चर्चा सुरू झाली होती.
परंतु, शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात येताच माध्यमांशी संवाद साधून स्पष्ट केले की, पुण्यात महायुती तुटलेली नाही. त्यांनी सांगितले,
“कोणत्याही महानगरपालिकेत महायुती तुटली आहे असे चित्र नाही. पुण्यात भाजपने नक्कीच एबी फॉर्म दिलेले आहेत, तसेच शिवसेनेच्या नेत्यांनीही विचार करून फॉर्म दिले आहेत. अर्ज माघारी घेण्याची तारीख आणि अर्ज छाननीची तारीख येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये.”
उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, वाटपामध्ये थोडेफार तिकडे-इकडे होत आहे. पण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. “शिवसेना जिथे जिंकू शकते अशा ठिकाणी आम्ही एबी फॉर्म दिले आहेत. सर्व बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरचा मुद्दाही नमूद करत सांगितले की, पुण्यासारखेच तेथेही काही मुद्दे उरले आहेत, पण पुढील दोन दिवसांत ते दूर केले जातील. यंदा ही २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे पहिले वर्ष असल्याने नेत्यांना बोलायला वेळ कमी मिळाला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गैरसमज करू नये, असेही त्यांनी म्हणाले.






















