Times of Maharashtra Desk: 2008 साली कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाला पुन्हा उधाण आले आहे. उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने त्या काळात राज्यभर मोठा राजकीय गोंधळ निर्माण केला होता. या प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि सात मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान, उमेदवारांवर झालेली मारहाण आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले होते. आज हाच जुना खटला पुन्हा एकदा ठाणे रेल्वे न्यायालयात चर्चेत आला. राज ठाकरे स्वतः न्यायालयात या सुनावणी साठी हजार होते.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सर्व आरोपींची उपस्थिती नोंदवून आवश्यक प्रक्रिया सुरू केली. राज ठाकरेंना “गुन्हा कबूल आहे का?” असा कायदेशीरदृष्ट्या आवश्यक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मला गुन्हा कबूल नाही” असे ठामपणे उत्तर दिले. या उत्तरानंतर न्यायाधीशांनी प्रकरणाचा निपटारा एका महिन्यात करण्याच्या दृष्टीने सर्व पक्षांनी न्यायालयाला सहकार्य करावे, असे निर्देश दिले. राज ठाकरे यांनी स्वतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने प्रक्रिया पुढे सुरळीत जाण्याची शक्यता वाढली आहे. काही मिनिटांची ही सुनावणी अत्यंत शांततेत आणि मर्यादित उपस्थितीत पार पडली.
सुनावणीनंतर राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आजची उपस्थिती ही केवळ कायदेशीर औपचारिकता होती. न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असल्याने राज ठाकरे प्रत्यक्ष येणे आवश्यक होते. आता पुढील सुनावण्यांसाठी त्यांना हजर राहण्याची गरज नाही. न्यायालयाने एका महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेत दिल्याने हा खटला अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आणि सर्व आरोपी न्यायालयाच्या सूचनांचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमके प्रकरण काय?
2008 साली “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” या मुद्द्यावरून राज्यात मोठे राजकीय वातावरण तापले होते. मनसेच्या आंदोलनांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी हिंसा भडकली. कल्याण स्थानकावरील रेल्वे भरतीच्या परीक्षेदरम्यान उमेदवारांवर झालेले हल्ले ही त्यातील सर्वात गाजलेली घटना ठरली. या हल्ल्यांमध्ये रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. काही काळ त्यांना अटकही झाली, पण नंतर जामीनावर सुटका झाली.
खटल्याची सुनावणी सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुरू होती. मात्र नंतर प्रकरणाची स्वरूप व क्षेत्राधिकार लक्षात घेऊन ते ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आले. सुनावणीसाठी आरोपी वेळोवेळी अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने कठोर भूमिका घेत अटक वॉरंट बजावले. राज ठाकरे यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने वॉरंट रद्द केले, मात्र आरोपींनी पुढे नक्कीच सहकार्य करावे, असे निर्देश दिले.
आता हा खटला पुन्हा गतीने पुढे जात असून न्यायालयाच्या सूचनेनुसार एका महिन्यात निकाल लागू शकतो. या प्रकरणाचा राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर प्रभाव पाहता सर्वांचे लक्ष ठाणे रेल्वे न्यायालयातील पुढील सुनावणीवर आहे.






















