Times of Maharashtra Desk: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (2017) अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षांपासून कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याचे धक्कादायक वास्तव विधानसभेतील चर्चेत समोर आले आहे. एकूण 6 लाख 56 हजार शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत असून, या योजनेच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी 5,975.51 कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 500 कोटींचीच तरतूद करण्यात आल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात मान्य केले.यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची थट्टा केली जात आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत अब्जावधी रक्कम; शेतकऱ्यांना फक्त 75 हजारांची मदत
ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल 1 अब्ज रुपये जमा झाले होते. मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपयांचीच मदत मिळाल्याचे आरटीआयमधून उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी मिळवलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांना प्रति टन ऊस मागे 10 रुपये निधीला देण्याचे सरकारचे फर्मान असूनही मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.
355 कोटी 55 लाखांची मदत तिजोरीतच अडकली
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 31,628 कोटींच्या मदत पॅकेजमधून अनेकांना लाभ मिळालेला नाही. ई-केवायसी पूर्ण नसणे, आधार-बँक माहितीतील तफावत आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे 5 लाख 42 हजार 141 शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांच्यासाठी निर्धारित 355 कोटी 55 लाखांची रक्कम सरकारी तिजोरीतच अडकून राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीत टीकांची धार तीक्ष्ण
हि बाब समोर येताच अंगार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. उज्वला थिटे यांनीही राजन पाटील यांच्या कुटुंबावर “कितीवेळा आनंद साजरा करणार?” असा सवाल उपस्थित करत टीकेची झोड उठवली आहे.राज्यातील शेतकरी प्रश्न, निधी अडथळे आणि अपुऱ्या तरतुदींवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीत हे मुद्दे प्रमुख ठरणार असून निवडणुकींवर यांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे.






















