Times of Maharashtra Desk: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज (23 डिसेंबर) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23 वी सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले.सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सर्व आरोपींना त्यांच्या विरोधातील संपूर्ण आरोप वाचून दाखवले आणि “हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का?” असा थेट प्रश्न विचारला. यावर मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड याने प्रथमच न्यायालयासमोर स्वतःहून आरोप नाकारत आपली भूमिका मांडली.
पुढील सुनावणी 8 जानेवारीला
या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच, तपास यंत्रणेकडून आरोपींच्या वकिलांना हत्या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ देण्यात आले होते. त्यानंतर आज अधिकृतपणे आरोप निश्चित करण्यात आले.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले की, “खंडणी मिळण्यास अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. आज सर्व आरोपींवर आरोप निश्चित झाले आहेत. आरोपींच्या वकिलांकडून वारंवार विलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, न्यायालयाकडे आम्ही खटला लवकरात लवकर चालवण्याची विनंती केली आहे. प्रत्यक्ष पुराव्यांचे सादरीकरण लवकरच सुरू होईल.”
प्रकरण नेमके काय ?
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची केज तालुक्यातील टाकळी शिवारात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आरोपींकडून घटनेशी संबंधित व्हिडीओ व छायाचित्रे मिळाल्याची नोंद आहे.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली होती. पोलिसांनी न्यायालयात सुमारे 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात घटनेचा संपूर्ण तपशील आणि उपलब्ध पुरावे नमूद करण्यात आले आहेत.






















