Times of Maharashtra Desk: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर अधिकृत घोषणा होणार असून उद्या, 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली असून, आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या पत्रकार परिषदेत युतीसोबतच महापालिका निवडणुकांसाठीच्या जागावाटपाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.मुंबईसह राज्यातील विविध महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने ठाकरे बंधूंची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे.
कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली – संजय राऊत
संजय राऊत यांनी युतीबाबत बोलताना सांगितलं की “शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही युती मनापासून स्वीकारली आहे. कोणाच्याही मनात संभ्रम नाही. तसे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले असून सर्वजण एकत्र येऊन कामाला लागले आहेत.”युतीबाबत मनोमिलन झालं असून जागावाटपावर काल रात्री शेवटचा हात फिरवण्यात आला, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. “युती झालेली आहे, केवळ जागावाटपाची अधिकृत घोषणा बाकी आहे. आमच्यात कोणताही विसंवाद नाही. वरळीतील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले, तेव्हाच युती झाली,” असं त्यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
1) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वरळीतील डोममध्ये एकत्र आले, तेव्हाच युती झाली.
2) जागावाटपावरून कोणताही मतभेद नाही; कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे.
3) युतीची घोषणा आज करायची की उद्या, यावर चर्चा सुरू होती.
4) नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मिरा-भाईंदरमधील जागावाटपाचा विषय पूर्ण झाला आहे.
5) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबत आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे.
6) काँग्रेसबाबत सध्या चर्चा थांबवली असली तरी भविष्यात संवाद सुरू राहील. गरज भासल्यास सहकार्य घेतलं जाईल.
उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






















