विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : सावदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवार, दि. २३ जानेवारी रोजी चोपडा–अंकलेश्वर महामार्गावर (सावदा–रावेर रोड) चक्का जाम आंदोलन केले. निधर्ष शेतकरी संघर्ष समिती, सावदा मंडळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सन २०२४–२५ च्या हंगामात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे तसेच तापमानातील चढ-उतारामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पंतप्रधान पीक विमा योजना व हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला असतानाही विमा कंपन्यांकडून अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून कर्जबाजारीपणात वाढ झाली आहे.
प्रशासनाकडून १५ जानेवारीपर्यंत पीक विम्याची भरपाई दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विम्याची सुमारे १५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.
या आंदोलनात सावदा मंडळासह धोरगव्हाण, रणगाव, रायपूर, तासखेडा, उधळी बुद्रुक, उधळी खुर्द, लुमखेडा परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. चक्का जाममुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
आता केवळ आश्वासन नको, थेट खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. अन्यथा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कुटुंबासह बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.






















