Times Of Maharashtra Desk : महाराष्ट्राच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राताई पवार यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या अकस्मित निधनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत धीरगंभीर वातावरणात हा शपथविधी सोहळा पार पडला.
या शपथग्रहण सोहळ्यासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून पतीचे, पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. तसेच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, अजित पवार हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू असून येत्या 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर होणार होता, असे त्यांनी सांगितले.
शपथविधीबाबद शरद पवार अनभिज्ञ
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना शरद पवार यांनीआपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निर्णय घेण्यासाठी एवढी घाई का केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या निर्णयामागे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भूमिका असावी, असे सूचक विधान शरद पवार यांनी केले. शरद पवार पुढे असेही म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत यासाठी गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. याची जबाबदारी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर होती. मात्र, अपघातामुळे या प्रक्रियेत खंड पडला. अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावेत आणि ती इच्छा पूर्ण व्हावी अशी आमचीही भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तृत्ववान नेता गमावल्याचा आघात
अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना शरद पवार म्हणाले की, अजित अनेक वर्षे संघटनेत आणि सामान्य लोकांशी थेट संवाद साधत काम करणारा कर्तृत्ववान नेता होता. लोकांच्या प्रश्नांची माहिती घेऊन त्यांना न्याय देण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. कर्तृत्ववान व्यक्ती सोडून गेल्याचा आघात संपूर्ण महाराष्ट्रावर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्याकडे कोणतीही चर्चा झालेली नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून मी कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले.






















