निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती विरळाच आढळतात. मात्र, कोठुरे येथील ज्येष्ठ नागरिक, तुळजा भवानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सक्रिय सदस्य व समाजसेवक श्री. वसंत नारायण कापसे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना “जीवन आरोग्य दूत” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामागे एक हृदयस्पर्शी घटना आहे. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सुधाकर रावजी मोगल हे काही दिवसांपूर्वी नाशिकहून रात्रीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र, संबंधित बस चालकाने त्यांना नियोजित ठिकाणी न उतरवता रस्त्यातच उतरवून दिले. अंधार, निर्जन परिसर आणि मदतीसाठी कोणीही नसलेल्या परिस्थितीत त्यांना अचानक पक्षाघाताचा (पॅरालिसिस) झटका आला. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला असहाय्य अवस्थेत पडून राहिले.
पहाटेच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना वसंत कापसे यांच्या नजरेस ही घटना पडली. त्यांनी कोणताही विचार न करता तातडीने मदतीचा हात पुढे केला. संबंधित व्यक्तीला त्वरित दवाखान्यात दाखल केले, त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आणि योग्य उपचार मिळवून दिले. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे सुधाकर मोगल यांचे प्राण वाचले.

या मानवतावादी कार्याची दखल घेत मोगल परिवार, कोठुरे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने वसंत कापसे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव म्हणून त्यांना “जीवन आरोग्य दूत” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना वसंत कापसे यांनी समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. “सरकारी असो किंवा खासगी वाहतूक सेवा, प्रत्येक चालक आणि वाहकाने माणुसकी जपत प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कोणत्याही प्रवाशाला निर्जन ठिकाणी उतरविण्याऐवजी त्याला सुरक्षितपणे बसस्थानक किंवा नियोजित ठिकाणी पोहोचविणे हे कर्तव्य समजले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक नियम व संवेदनशीलता निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वसंत नारायण कापसे यांनी दाखविलेली माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि संकटसमयी धावून जाण्याची वृत्ती ही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कार्यामुळे “माणुसकी हाच खरा धर्म” या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे






















