Times Of Maharashtra Desk : निष्ठा, सातत्य आणि प्रामाणिक लोकसेवा असेल तर अशक्यही शक्य होते, हे आपल्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून सिद्ध करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत पवार यांचा पाथर्डी तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कोकिसपीर व अहिल्यानगर परिसरातील तांड्यांना ‘महसुली गाव’ आणि त्यानंतर ‘स्वतंत्र ग्रामपंचायती’चा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजने’चे राज्य समन्वयक महंत जितेंद्र महाराज यांनी भूषवले.
१९९५ पासूनचा अविरत संघर्ष
या यशामागे तीन दशकांचा मोठा संघर्ष आहे. १९९५ मध्ये माणिकदौंडी ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन झाले, तेव्हा अनेक वाड्या स्वतंत्र झाल्या, मात्र कोकिसपीर, वाघेवाडी, वंजारवाडी या वाड्या मूळ गावालाच जोडून राहिल्या. याच काळात विष्णुपंत पवार यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. सरपंचपद हुकले आणि विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली, तरी पद नसले तरी काम करता येते हे त्यांनी दाखवून दिले. ऊसतोडणीसाठी भटकंती करणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा दिला , कोकिसपिर तांडा येथे सर्वप्रथम मतदान केंद्र आणि स्वस्त धान्य दुकान मंजूर करून घेतले. बालखंडी बाबा यात्रेतील पशुहत्या थांबवणे असो वा मंदिराचे पावित्र्य राखणे, त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे त्यांची पहिली निवडणूक बिनविरोध झाली होती.

विकासाची गंगा आणि प्रशासकीय लढा केवळ राजकीय लढा न देता त्यांनी तांड्यावर विकासाची गंगा आणली. खासदार सूर्यभान पाटील, वाहाडणे पाटील आणि आमदार धोंडीराम राठोड यांच्या सहकार्याने त्यांनी वसंतराव नाईक सभागृह, पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी, स्मशानभूमी आणि रस्ते काँक्रिटीकरण अशी अनेक कामे मार्गी लावली.
मात्र, खरा लढा होता तो तांड्याच्या स्वतंत्र अस्तित्वाचा! २०१२ पासून सुरू झालेला प्रशासकीय पाठपुरावा आणि ८ वर्षांच्या संघर्षानंतर, आमदार मोनिका राजळे यांच्या सहकार्याने २०१९-२० मध्ये तांड्याला ‘महसुली गावा’चा दर्जा मिळाला.
अखेर स्वप्नपूर्ती:
९ तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत महसुली गाव झाल्यानंतरही ‘ग्राम कोड’ आणि ‘आकार बंद’ या तांत्रिक अडचणी होत्याच. २०२४ मध्ये राज्य शासनाने ‘संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना’ जाहीर केली आणि या समितीवर विष्णुपंत पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली. मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि महंत जितेंद्र महाराज यांच्या पाठिंब्यामुळे २०२५ च्या अखेरीस कोकिसपीर तांड्यासह सेवानगर (तोंडोळी), हनुमान नगर (साकेगाव), वाघदारा, आंबेवाडी, वसंतराव नाईक तांडा (कळसपिंपरी) अशा एकूण नऊ तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला.






















