Times of Maharashtra Desk Government Water Scheme: परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात “हर घर जल” हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. तालुक्यातील गावांमध्ये शासनाकडून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे परंतु योजना चालू झाली तरी येथील बऱ्याच गावातील नळ अद्यापही कोरडेच आहेत. या योजनेसाठी शासना कडून कोट्यावधीची निधी मंजूर होऊन देखील अजूनही इथल्या अनेक गावात पाणी पुरवठा सुरू झाला नाही. ज्या अभियंताना या योजनेचे काम दिले होते त्याच्या हलगर्जीपणामुळे या योजनेची दुर्दशा झाली आहे. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
नेमकी योजना काय?
जलजीवन योजने अंतर्गत गावात पाण्याच्या टाक्या बसवणे, पाइपलाइन टाकणे , नळ जोडणे व संपूर्ण गावाला पाणी पुरवणे ही कामे करण्यात येणार होती. या कामांची जबाबदारी ठेकेदारांना देण्यात आली होती. ही कामे काही भागात पूर्ण झाली आहेत, तर काही भागात अद्यापही कामे कासवाच्या गतीने चालू आहेत. काम पूर्ण झालेल्या भागात देखील अद्याप पाणी सुरू झाले नाही. यावरून शासनाने दिलेला निधी वाया गेला असेच चित्र दिसत आहेत.
ही योजना ग्रामपंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही योजना नुसती कागदापुरती मर्यादित राहिली आहे असे ग्रामस्थानेचे म्हणणे आहे. ठेकेदाराकडून बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत, तर जिथे कामे पूर्ण झाली आहेत तिथे अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी गेल्यावर उपविभागाव व कनिष्ठ अभियंते कार्यालयात हजर नसल्याचे वारंवार दिसते. अनेकदा त्यांच्या कक्षांना कुलूप असते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सरकारने खबरदारी घ्यावी व लवकरात लवकर कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.






















