देऊळगाव राजा ( प्रतिनिधी बबनराव नागरे) : हिंदू धर्माची एकजूट साधून राष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने तसेच जाती, पंथ, भाषा आणि भेद विसरून संस्कृतीचे संरक्षण व सामुदायिक विकास घडवून आणण्याच्या हेतूने सकल हिंदू समाजाच्या वतीने देशभर हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शहरातील बालाजी नगर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती येथे दिनांक 22 मार्च रोजी हिंदू संमेलन उत्साहात पार पडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापना होऊन 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात अशा संमेलनांद्वारे एकतेचा संदेश दिला जात आहे. या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या संघाचे प्रचारक स्वप्निल राऊत यांनी हिंदू संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “विविधतेत एकता” हा हिंदुत्वाचा मूलमंत्र आहे. प्रत्येक प्राण्यात देव पाहण्याची दृष्टी हीच आपल्या संस्कृतीची ओळख असून समाजात परस्पर सन्मान आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी हे तत्त्व आचरणात आणणे आवश्यक आहे. पुढील पिढीमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात महिला प्रतिनिधी म्हणून प्रा. अश्विनी जाधव-मेहेत्रे यांनी “स्त्री शक्ती” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजात आपली भूमिका बजावावी, तसेच निडरपणे आपला आवाज उठवावा असे आवाहन केले. इतिहासातील जिजाऊंच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी महिलांच्या योगदानाची जाणीव करून दिली.
तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जयमंगल जाधव यांनी हिंदू संमेलनांची आवश्यकता आणि त्यामागील सामाजिक उद्दिष्टे यावर सखोल विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोमाता पूजन करण्यात आले. एका बाल कलाकाराने बजरंगबलीची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच गजानन खांडेभराड यांनी ‘वासुदेव’ या पारंपरिक भूमिकेतून परिसरात जनजागृती करत कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक समाधान घुगे यांनी केले. समारोप प्रसंगी भारत मातेची आरती करण्यात आली व उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक हिंदू समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले.






















