गेवराई (प्रतिनिधी – विष्णु गायकवाड):
देशातील सर्वात मोठी लोकसंख्या मोजणी प्रक्रिया असलेल्या जनगणनेला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, तब्बल २०११ नंतर प्रथमच ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा १६ मे ते १५ जूनदरम्यान पार पडणार आहे.
या पहिल्या टप्प्यात ‘घरगणना’ करण्यात येणार असून, प्रगणक घराघरात जाऊन मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहेत. यामध्ये कागद-पेनचा वापर टाळून थेट डिजिटल नोंदणीवर भर दिला जाणार आहे. घराची रचना, मालकी हक्क, पाणी व वीज सुविधा, स्वच्छतागृह, इंटरनेट तसेच उपलब्ध वाहनांची माहिती नोंदवली जाणार आहे.
यावेळच्या जनगणनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. संकलित झालेला डेटा तत्काळ ‘सीएमएमएस’ पोर्टलवर अपलोड केला जाणार असल्याने पारदर्शकता वाढेल आणि मानवी त्रुटी कमी होऊन प्रक्रिया अधिक जलद होणार आहे.
निवासी नसलेल्या जागांसाठी (दुकान, गोदाम आदी) फक्त २ ते ३ प्रश्नांद्वारे माहिती नोंदवली जाणार आहे. जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून, अॅप वापर, माहिती संकलन आणि पूर्वतयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
ही जनगणना दोन टप्प्यांत होणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती घेतली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
३४ प्रश्नांमध्ये घराचे स्वरूप (कच्चे/पक्के, स्वतःचे/भाड्याचे), पाणी-वीज सुविधा, स्वच्छतागृह, इंटरनेट, वाहने, टीव्ही, लॅपटॉप तसेच घरातील सदस्यांची संख्या याबाबत माहिती विचारली जाणार आहे. ही जनगणना देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.






















