म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) : शहरात सध्या पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे. या विस्कळीत पुरवठ्यामुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच तीव्र झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शहरातील जुन्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जीवन प्राधिकरणाची योजना कार्यरत असली तरी ती कालबाह्य ठरल्याने समस्यांमध्ये भर पडत आहे. विशेष म्हणजे, नवीन जलयोजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊनही नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. पालिकेने नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण केले असले तरी त्याचे प्रत्यक्ष फायदे अद्याप नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाहीत.
पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी एकहाती सत्ता दिली. मात्र, सत्तेचा कारभार हाती घेतल्यानंतरही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. उन्हाचा पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. घामाने अंग चिंब होत असताना पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांप्रमाणेच आता शहरातील लोकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे “२४/७ पाणी नको, निदान चार दिवसांतून एकदा तरी पाणी द्या” अशी साधी मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सांगितले की, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. नवीन जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याची चाचणी (टेस्टिंग) करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, नागरिकांचा संयम संपत चालला असून लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. प्रशासन आणि सत्ताधारी यांची कसोटी आता लागणार आहे.






















